बालपुस्तक जत्रेचे मॉडेल राज्यभर राबवणार   

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा

पुणे : सध्याच्या मोबाईल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मुलांचा मातीशी नाळ जुळलेली राहावी यासाठी वाचनसंस्कृती वृद्धिंगत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले. पुण्यात झालेल्या बालपुस्तक जत्रेचे मॉडेल आता राज्यभर विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर राबवले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
 
गणेश कला क्रीडा मंच येथे राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे बालपुस्तक जत्रा कार्यक्रमात मंत्री भुसे बोलत होते. या वेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, प्रसेनजित फडणवीस आणि संवाद पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते.
 
कार्यक्रमात ‘किशोर’ मासिकाचा विशेष अंक तसेच साने गुरुजी यांचे ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद भुसे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
भुसे पुढे म्हणाले, ही बालपुस्तक जत्रा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात किंवा देशात अन्यत्र पाहायला मिळत नाही. हा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी शिक्षण विभाग पुढाकार घेईल.
 
ते पुढे म्हणाले, राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज आर्थिकदृष्ट्या सक्षम पालक इंग्रजी माध्यमात मुलांना शिक्षण देतात, तर गोरगरीब मुले जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जातात. त्यामुळे सामाजिक दरी वाढते आहे. ही दरी भरून काढण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहोत.
 
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर शिकवावा, अशी मागणी केली होती. ती मागणी तातडीने मान्य करण्यात आली असून अंमलबजावणीसाठी निर्देशही दिले आहेत. तसेच, अभिजात दर्जा प्राप्त मराठी भाषा इतर शिक्षण माध्यमांत सक्तीची करावी, अशी मागणीही केली असून सीबीएसईने त्यानुसार पावले उचलली आहेत.राज्यात २ कोटी १२ लाख विद्यार्थी आणि ७ लाख शिक्षक आहेत. शिक्षण क्षेत्र अतिशय व्यापक असून त्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.
 
बालपुस्तक जत्रेला प्रतिसाद
 
पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या बालपुस्तक जत्रेला तीन दिवसांत २५ हजारांहून अधिक मुलांनी भेट दिली. या जत्रेत खेळ, पुस्तके, खाऊ यांचे अनोखे मिश्रण मुलांना अनुभवायला मिळाले. ही बालजत्रा मुलांच्या भावविश्वाला निश्चितच समृद्ध करेल, असा विश्वास आयोजक राजेश पांडे यांनी व्यक्त केला.

Related Articles